ब्लॉग शोधा

रविवार, २८ एप्रिल, २०२४

पांडुरंग नंदराम भटकर : मुकनायक वृत्तपत्राचे पहिले संपादक

पांडुरंग नंदराम भटकर : बाबासाहेबांचे समविचारी सहकारी
डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे आज अवघ्या विश्वाला प्रेरक असणारं आणि मान्य असणारं व्यक्तिमत्व आणि नेतृत्व आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष,त्यांची कार्यशैली,त्यांचे कष्ट,त्यातून निर्माण झालेले मानवतावादी कार्य आणि बाबासाहेबांचे एकूण तत्वज्ञान ही अखिल विश्वासाठी,विश्वाच्या उज्ज्वल भविष्यासाठी निर्माण झालेली संपत्ती आहे.आज कोणतेही राष्ट्र,राज्य वा समूह हा डॉ.आंबेडकरांच्या वैचारिक,सामाजिक,राजकीय आणि आर्थिक भूमिकेशिवाय स्वतंत्र विचार करू शकत नाही.बाबासाहेबांच्या ह्या भूमिकांना,तत्वांना खूप मोठा इतिहास आहे.हा इतिहास अगदी ज्योतिबा फुल्यांपासून मागे, थेट कबीर ते थेट महात्मा गौतम बुद्धापर्यंत जातो.त्यामुळे स्वातंत्र,समता आणि बंधुता या तत्वत्रयीच्या आधारे माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठीचा जो संघर्ष वेळोवेळी उभा राहिला आहे,त्या संघर्षात सहभागी असणाऱ्या प्रत्येक मानवतावादी मूल्यांशी,समूहाशी बाबासाहेबांच नातं आहे.हे नातं त्यांनी त्यांच्या अफाट कष्टांतून,वाचनातून निर्माण केलं  आहे.जपलं आहे. 
पांडुरंग नंदराम भटकर

    उपेक्षित म्हणून आलेल्या अनुभवांनी बाबासाहेबांना खूप मोठा संघर्ष करायला सिद्ध केलं.त्याकाळातील त्यांचे सहकारी यांचीही भूमिका बाबासाहेबांच्या जडणघडणीत अत्यंत मोलाची आहे.महाराष्ट्राच्या दलित चळवळीचा इतिहास बघितला तर बाबासाहेबांच्या या समकालीन सहकाऱ्यांची एक मोठी यादी समोर येते.त्यातील एक महत्वाचा नाव पांडुरंग नंदराम भटकर.बाबासाहेबांच्या या मानवतावादी चळवळीमध्ये पांडुरंग नंदराम भटकर यांच्या उल्लेख येतो तो ते मूकनायक या नियतकालिकाचे पहिले संपादक म्हणून.ते विदर्भातील विद्वान होते आणि त्यांनी एका ब्राह्मण स्त्रीशी विवाह केला होता एवढाच काय तो संदर्भ त्यांच्याबाबतीत वारंवार सापडतो.मात्र पांडुरंग नंदराम भटकर हे त्याकाळातील शैक्षणिक आणि सामाजिक सुधारणाबाबत काम करणारं एक स्वतंत्र व्यक्तित्व होतं. डॉ .बाबासाहेब आंबेडकर आणि  पांडुरंग नंदराम भटकर यांच्यात एक नातं आहे,सख्य आहे.हे नातं आणि सख्य आजन्म टिकलेलं आहे. बाबासाहेबांचा शैक्षणिक संघर्ष,बाबासाहेबांच्या नेतृत्वाचा उदय,शाहू महाराज यांचे कार्य,विठ्ठल रामजी शिंदे यांचे अस्पृश्योद्धाराचे कार्य, तत्कालीन राजकीय घडामोडी,उपेक्षित विशेषतः महार समाजात चालू असलेल्या राजकीय घडामोडी,उपेक्षित समाजाला त्याकाळात शिक्षणासाठी करावा लागणारा संघर्ष,बाबासाहेबांवरील बौद्ध धर्माचा प्रभाव,त्यांची धर्मांतराची चळवळ,संविधाननिर्मितीचे बाबासाहेबांचे कार्य या सर्व बाबींचे विश्लेषण करत असताना पांडुरंग नंदराम भटकर याचं बाबासाहेबांना समविचारी असणारं एक संयत व्यक्तिमत्व समोर येतं.
    पांडुरंग नंदराम भटकर यांचा जन्म १८९० सालचा. म्हणजे बरोबर बाबासाहेबांच्या जन्माच्या एक वर्ष आधी त्यांचा जन्म झाला.वडील शेतकरी.वतनाची दहा एकर शेती त्यांच्याकेडे होती.एक भाऊ सैनिकी सेवेत .महार जातीतील मुलांना शिक्षण घेणे यासाठी प्रतिकूल असणारा हा काळ.याकाळात त्यांनी वडिलांच्या आणि भावाच्या प्रेरणेने अकोल्यातील सरकारी शाळेमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले .दहावीचे शिक्षण त्यांनी चांगल्या श्रेणीत उत्तीर्ण केले.दहावीतच त्यांना संस्कृत हा विषय चांगल्या प्रकारे अवगत होता.पुण्या -मुंबईत त्याकाळात संस्कृतमध्ये चांगले गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी फेलोशिप मिळत असे.परंतु जातीने महार असणे ही बाब बरोबर त्यांच्या आडवी येणे क्रमप्राप्त होते.परिस्थिती प्रतिकूल असूनही त्यांनी पुणे गाठले आणि त्यावेळच्या नामांकित अश्या फर्गुसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.या कॉलेजमधून ते १९०८ साली इंटरएमिजिएट (पदवीपूर्व शिक्षण) झाले.काही संदर्भ त्यांचे प्राथमिक शिक्षण हे अकोल्यात झाले असे आहेत तर काही संदर्भात ते पुण्यातच दहावी झाले असे आढळते. खरे तर १९१० पर्यंतचा काळ हा केवळ उपेक्षितांनी भोगण्याचा काळ होता.फार पूर्वी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाबाबत फार मोठे काम केले होते.परंतु त्यांचे हे प्रयत्न केळीवेळीसारख्या छोट्याशा गावापर्यंत पोहचण्याची शक्यता फार कमी होती.महार जातीतील लोकांना केवळ लष्करात नोकरी करणे एवढा एक पर्याय होता.शाहू महाराजांना वेदोक्त प्रकारानंतर अस्पृश्यांच्या दुःखाची फार मोठी जाणीव झाली.तो हाच काळ होता .१९०९ साली मोर्ले मिन्टों सुधारणांनी अनेकजातींना राजकीय अधिकाराबाबत  प्रतिनिधित्वाचे रस्ते खुले केले. याच काळात बाबासाहेब शिक्षणासाठी अपार कष्ट घेत होते.अखिल अस्पृश्य समाजाला बाबासाहेब नावाच्या सूर्याची तेव्हा जाणीवही नव्हती.हा योगायोगच म्हणावा लागेल कि बाबासाहेबांचे वडील हे लष्करात होते आणि पांडुरंग भटकर यांचे भाऊही लष्करात होते .त्यामुळे शिक्षण घेवून पुढे जाण्याची प्रेरणा म्हणा वा मदत त्यांना मिळाली होती.हिरा बनसोडे आणि शिवराम जानबा कांबळे यांसारखे काही लोक समाजाच्या दुःखाला वाचा फोडण्याचे काम करत होते. विठ्ठल रामजी शिंदे यांनी पुढाकार घेऊन भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळी (डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया) ही संस्था अखिल भारतीय पातळीवर अस्पृश्यतानिवारणाचे आणि अस्पृश्य मानल्या गेलेल्या वर्गाची उन्नती करण्याचे कार्य करण्यासाठी १८ ऑक्टोबर १९०६ रोजी स्थापन केली होती १९०९ साली पांडुरंग नंदराम भटकर विठ्ठल रामजी शिंदे यांच्या संपर्कात  आले.    पुण्यासारख्या विद्येच्या नगरात राहून प्राकृत ,संस्कृत ,मराठी आणि इंग्रजी या भाषांमधून  शिक्षण प्राप्त करणे हे खूप कष्टसाध्य काम होते.विसाव्या शतकाच्या प्रारंभी गावखेड्यातून गेलेल्या एका तरुणाने पुणे आणि मुंबई सारख्या वातावरणात मिसळणे आणि अभ्यास करून पुढे येणे ही त्याकाळाच्या मानाने खूप मोठी गोष्ट होती.पांडुरंग भटकर हे पुण्यात असताना त्यांचा प्राकृत भाषेशी संबंध आला.त्यात पाली भाषा ही त्यांना अधिक जवळची.त्याकाळात पुण्यात संस्कृत अध्ययन आणि अध्यापन केले जाते हे सर्वश्रुत होते आणि आहे.परंतु एक गोष्ट महाराष्ट्रातील आणि भारतातील विद्वानांच्या लक्षात आली नाही किंवा हेतुपुरस्सर येवू दिली नाही आणि ती म्हणजे पुण्यात बौद्ध धर्माचा खूप  मोठ्या प्रमाणावर अभ्यास केला जात होता आणि आजही तो केला जातो.तिबेट आणि चीनमधील बौद्ध माठ सोडले तर भारतात कुठेही नसतील एवढी बौद्ध साहित्याची हस्तलिखिते पुण्याच्या भांडारकर संस्थेकडे आहेत.त्याकाळात पांडुरंग नंदराम भटकर याच वातावरणात वावरत होते. बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानाकडे त्यांचा विशेष कल होता आणि त्याबाबतीत त्यांचे बरेचशे वाचन चालू होते.मूकनायक या नियतकालिकाच्या संपादकपदी यांची नेमणूक करण्याआधी त्यांची पुणे मुंबई परिसरात विदर्भातील विद्वान अशीच ख्याती निर्माण झाली होती. आणि त्यांची ही विद्वत्ता त्यांच्या चौफेर वाचनातून त्यांना प्राप्त झाली होती ज्यात बौद्ध साहित्याच्या वाचनाचा भाग अधिक होता.बौद्ध साहित्य आणि त्याकाळातील सामाजिक सुधारणा हा पांडुरंग नंदराम भटकर यांच्या आस्थेचा विषय होता.१९०६ पासून महर्षी शिंदे बुद्धजयंती साजरी करीत असत. बंगाली विश्वकोशाचे संपादक बाबू नागेन्द्रनाथ बसू यांनी १९११ मध्ये आधुनिक बौद्धधर्म आणि त्याचे ओरिसातील अनुयायी  या पुस्तकाचा संदर्भ घेवून त्याच काळात महर्षी शिंदे बौद्धधर्माचा अभ्यास करत होते. ही बाब भटकर यांच्याही  निष्ठेची होती.रा.गो. भांडारकर हे त्याकाळातील संस्कृत पंडित; परंतु पाली साहित्याचा, बौद्ध धर्माचा त्यांचा गाढा अभ्यास होता.मराठीतील संतसाहित्य याबद्दलही ते तळमळीने बोलत असत.अनेकदा पांडुरंग नंदराम भटकर यांनी पुण्यात भांडारकरांचे संतसाहित्य आणि बौद्ध धर्म याबद्दलचे विचार ऐकले होते.संत तुकाराम आणि संत चोखामेळा यांच्या अभंगाबद्दल भटकर यांना विशेष ओढ.तेथूनच त्यांची सामाजिक दृष्टी अधिक प्रगल्भ झाली होती.
    याच काळात त्यांना पदवी शिक्षण पूर्ण करण्यास अपयश आले होते.परंतु मोठ्या जिद्दीने त्यांनी पुन्हा अभ्यास करून पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. पुण्यात विद्यार्थ्यांना संस्कृतची फेलोशिप मिळणे ही जशी त्याकाळातील गौरवाची बाब समजली जाई. त्याचकाळात उपेक्षित वर्गातून आलेल्या मुलांसाठी बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड हे शिक्षणासाठी फेलेशीप देत असत.डॉ.बाबासाहेब आंबेडकर ही फेलोशिप प्राप्त करून नुकतेच विदेशातून आलेले होते .याच प्रकारची फेलोशिप पांडुरंग नंदराम भटकर यांनाही बडोद्यांच्या रांजांकडून मिळाली होती.आणि ही फार मोठ्या गौरवाची बाब होती. याकामात त्यांना महर्षी विठ्ठल रामजी  शिंदे यांनी त्यांची मदत केली होती. शिक्षण घेत असताना आपल्या अवती भवतीच्या समाजाविषयी त्याच्या विकासाविषयीची भावना पांडुरंग भटकर यांच्या मध्ये विकसित होत होती.
        १९१७ साली भारत मंत्री मोंटेग्यु भारतात राजकीय सुधारणा देण्यासाठी साक्ष घेत होते त्यावेळी डिप्रेस इंडिया असोसिएशन ने अस्पृश्य समाजाच्या अधिकारासाठी निवेदन दिले होते.त्यात पांडुरंग नंदराम भटकर यांचा पुढाकार होता .(१९२२ मध्ये हीच sabha नागपूरला स्थापन करण्यात आला .तिची कार्यव्याप्ती मध्य प्रांतापुरती मर्यादित होती ,यामध्ये भटकर यांनी सदस्य म्हणून काम पहिले.)    
    सन १९१८ मध्ये नामदार विठ्ठलभाई पटेल यांनी मिश्र विवाहाचे विधेयक मध्यवर्ती विधिमंडळात विचारार्थ मांडले होते.त्याला सर्व पक्षातील प्रतिगामी ब्राह्मण नेत्यांनी ,विचारवंतानी विरोध केला होता.त्या विरोधाचे अग्रणी लोकमान्य टिळक आणि शंकराचार्य कुर्तकोटी होते.या विधेयकाला छत्रपती शाहू महाराज यांनी पाठिंबा दिला होता.या विधेयकाच्या समर्थनार्थ पांडुरंग नंदराम भटकर यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.१९१९ साली भायखळा मुंबई येथे याच विधेयकासंदर्भात सोमवंशीय निराश्रित सुधारक मंडळ यांची एक सभा आयोजित करण्यात आली होती. मिश्रविवाह विधेयकाला पाठींबा देणे,अस्पृश्य समाजातील मुलांना मोफत आणि सक्तीने प्राथमिक शिक्षण देणे , अस्पृश्य मुलांना शिक्षकाच्या नोकऱ्या देणे,अस्पृशता मानू नये आणि अस्पृश्यांना नागरिकत्वाचे हक्क समानतेने मिळावे हे सर्व मुद्दे पांडुरंग भटकर यांनी सभेद्वारे सरकारसमोर मांडले.ही फार मोठी गोष्ट होती.त्यामुळे डॉ.आंबेडकरांच्या आधी या प्रकारची भूमिका घेणाऱ्यांमध्ये पांडुरंग नंदराम भटकर यांचे नाव अग्रणी आहे. तेथूनच बाबासाहेब आणि पांडुरंग नंदराम भटकर यांचे एक समविचारी नाते तयार झाल्याचे लक्षात येते.विठ्ठल रामजी शिंदे यांच्या आश्रमातील वेणूताई या धर्माने ब्राह्मण असणाऱ्या विधवेशी त्यांनी विवाह केला होता.ही बाब त्यांचे विचार आणि त्यांचे कर्तुत्व त्यांच्यातील एकवाक्यता दर्शविते.   
    साउथबरो कमिशन आणि त्यासंदर्भात बाबासाहेबांनी अतिशय जागरूकपणे अस्पृश्यांच्या संदर्भात केलेल्या कार्यामुळे तमाम ब्रिटीश भारतातील वंचित आणि दलित समाजात बाबासाहेब नावाचे मोठे नेतृत्व उभे झाले. छत्रपती शाहू महाराज यांनीही बाबासाहेबांच्या ह्या नेतृत्वाला मान्यता दिली होती. तो काळ १९१८-१९१९ चा. या काळात राजकीय आणि सामाजिक विषयावर लेखन चिंतन करणारे अनेक नियतकालिके अस्तित्वात होती .परंतु हिनदिन समाजाबद्दल लेखन करणारे एकही नियतकालिक नव्हते.या सर्व परीस्थितीत एक नियतकालिक असावे यासाठी बाबासाहेबांनी पुढाकार घेतला आणि मूकनायक ची सुरुवात झाली.या कार्यासाठी छत्रपती शाहू महाराज यांनी आर्थिक मदत केली.दत्तोजी पवार यांनी बाबासाहेब आणि शाहू महाराज यांची या संदर्भात मदत केल्याचे उल्लेख सापडतात. ही एक ऐतिहासिक पोकळीही असू शकते कि मूकनायकच्या आधीच्या घडामोडीत पांडुरंग भटकरांचे कुठेही नाव येवू नये.खरे तर साउथबरो कमिशन पासून अस्पृश्यांची जी काही चळवळ बाबासाहेबांच्या नेतृत्वात उभी राहत होती त्यात पांडुरंग नंदराम भटकर यांचा कार्यशील सहभाग राहिला आहे.१९१६-१९१७ या काही वर्षांपासून निमित्तानिमित्ताने बाबासाहेब आणि पांडुरंग भटकर यांच्या भेटी झालेल्या आहेत.महर्षी शिंदे यांनी पुण्याला अहिल्याश्रम बांधला होता.बाबासाहेब पुण्यात आले कि या आश्रमात उतरत असत.त्याकाळात पांडुरंग भटकर याच आश्रमात राहत असत.ज्या विधवा ब्राह्मण मुलीशी भटकर यांनी लग्न केले होते ती याच आश्रमात राहत होती. बौद्ध धर्म हे एक निमित्त घेवून महर्षी शिंदे आणि बाबासाहेब यांच्या चर्चा होत असत .या चर्चेमध्ये भटकर यांचाही सहभाग असे.येथूनच बाबासाहेब आणि पांडुरंग भटकर यांचा स्नेह जुळला होता. शिवाय पांडुरंग नंदराम  भटकर यांचा  साहित्याचा अभ्यास त्यातही प्राकृत साहित्याचा,बौद्ध साहित्याचा अभ्यास यावरून बाबासाहेबांच्या मनात भटकर यांच्याबद्दल अपार आदर होता आणि त्यांच्याशी अनेकवार झालेल्या चर्चेतूनच बाबासाहेबांनी मूकनायकच्या संपादनाची जबाबदारी भटकर यांच्यावर सोपविली . प्रारंभी भटकर यांना ही जबाबदारी देण्यासंदर्भात काही कार्यकर्त्यांकडून विरोध दर्शविण्यात आला.कारण एकच की त्यांनी ब्राहमण जातीच्या मुलीशी लग्न केले होते.जातीअंताकडे जाणारी ही चळवळ तिच्या प्रारंभीच अशा पद्धतीने जातीप्रश्नाने ग्रासलेली होती.बाबासाहेब यांनीच याबाबत पुढाकार घेतला आणि विरोधकांना भटकरांचे मोठेपण पटवून दिले.बाबासाहेब नावाचा तेजस्वी माणूस एखाद्या माणसाचे मोठेपण विनाकारण पटवून देणे शक्य नाही. पांडुरंग नंदराम भटकर यांनी मूकनायकची जबाबदारी घेतली. बाबासाहेब सीडनेहम कॉलेजला नोकरीला असल्यामुळे त्यांना संपादक म्हणून काम करता येत नव्हते .शिवाय शिक्षणासाठी त्यांना त्याच काळात अमेरिकेला जायचे होते .ह्या बाबी लक्षात घेवून मूकनायकच्या संपादनाची जबाबदारी भटकर यांच्यावर आली .इतिहासकारांनी मूकनायक मधले बाबासाहेबांचे कार्य कुठले आणि संपादकाचे कार्य कुठले याचे काही तपशील दिले आहेत. काकगर्जना हा पांडुरंग नंदराम भटकर यांच्या संपादकत्वाखाली निघालेला एक विशेष अंक.मानवी उत्थानाच्या संदर्भात जो काही प्रश्न असेल त्याला बाबासाहेबांनी स्पर्श केला आहे.अंकातील अग्रलेख सोडला तर स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल पांडुरंग भटकर यांनी लिहिले आहे. इतिहासात हिंदुकोड बिल म्हणून स्त्रीस्वातंत्र्याचा जो ऐवज आहे त्याला तोड नाही.आणि आधीचा इतिहास बघितला तर राजाराम मोहन  रॉय ,ईश्वरचंद्र विद्यासागर ,महात्मा ज्योतिबा फुले या कर्त्या सुधारकांची  नावे घेतली जातात. वर्णव्यवस्थेच्या अत्यंत जाचक काळात पांडुरंग भटकर यांनी एका विधवेशी विवाह केला आहे ,एवढेच नाही तर ही विधवा धर्माने ब्राह्मण होती .त्यामुळे स्त्रीदास्य विमोचानाच्या लढाईत भटकर यांचाही लक्षणीय सहभाग होता हे विसरून चालणार नाही.
पुढील दोन वर्षात त्यांना अमरावती आणि नागपूर या आपल्या मातृप्रदेशाकडे जावून शैक्षणिक कार्य करायचे होते म्हणून त्यांनी संपादकत्व सोडले आणि ते अमरावतीला निघून आले.
    भारतीय राजकारणात कायदे मंडळात स्वतंत्र प्रतीनिधित्वाचे तत्व १९०९ च्या मोर्ले मिंटो सुधारणांमुळे आले.१९२० च्या मोंटेग्यु चेम्सफोर्ड सुधारणामुळे हे अधिकार अधिक व्यापक झाले.अस्पृश्यांना मात्र यामध्ये स्वतंत्र प्रतिनिधित्व मिळाले नव्हते.मात्र प्रांताच्या कायदेमंडळावर अस्प्रश्यांचे एक किंवा दोन प्रतिनिधी नियुक्त करण्याचे अधिकार मिळाले होते.मध्यप्रांत व वऱ्हाड या प्रांतातून कायदे मंडळावर अस्पृश्याचे चार प्रतिनिधी घ्यावयाचे होते.त्यापैकी दोन प्रतिनिधी मराठी विभागातून नियुक्त व्हावयाचे होते.शिफारस करण्यासाठी एक सभा दिनांक २१-११-२०१८ रोजी  नागपूरच्या संत्रा मार्केट मध्ये भरली .या सभेत पांडुरंग नंदराम भटकर यांचे नाव यावर निर्णय झाला होता .परंतु पांडुरंग भटकर यांचे नाव सरकारकडे गेले नाही.खरेतर माणूस अति महत्वाकांक्षी झाल कि तो नियमांना,माणसांनाजुमानत नाही.इथे पांडुरंग भटकर यांचे नाव येवू न देणे यामागे स्वार्थप्रेरित राजकारण कार्यरत होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनाही न जुमानणारा एक वर्ग तेथे होता.पांडुरंग भटकर हे भिडस्त आणि संयमी त्यामुळे त्यांनी कुय्हालेही राजकारण केले नाही वा कुणावर दबाव आणला नाही.समाजासाठी आपले काम ते नेटाने करत राहले.
    मध्यप्रांत व वऱ्हाड महार परिषद १२ वे अधिवेशन मी १९२३ मध्ये थुगाव अमरावती येथे भरले .या परिषदेचे अध्यक्षपद पांडुरंग भटकर यांच्याकडे होते. २६-०४-१९२६ ला चोखामेळा बोर्डिंग नागपूरला अखिल भारतीय डिप्रेस्ड क्लासेस सभा आयोजित करण्यात आली होती . अस्पृश्य समाजासाठी विविध मार्गांनी ,विविध संस्थांनी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न चालविले होते ,या सर्व संस्थांचे एकीकरण व्हावे हा सभेचा उद्देश होता.या सभेसाठी पांडुरंग नंदराम भटकर यांनी विशेष पुढाकार घेतला ,कारण ते या मिशनचे अनेक वर्षापासुनचे कार्यकर्ते होते.
    नेहरू समिती , सायमन कमिशन आणि राउंडटेबल कॉन्फरन्स यासंदर्भात डॉ बाबासाहेबांनी केलेले कार्य येथून बाबासाहेबांच्या कामाला खऱ्या अर्थाने वेग आला.बाबासाहेबांच्या भूमिकेला,मताला येथून महत्व प्राप्त व्हायला सुरुवात झाली.बाबासाहेबांच्या जागी राउंडटेबल कॉन्फरन्सला आपली वर्णी लागावी यासाठी कार्य करणारा एक आक्रमक कार्यकर्तावर्ग त्याकाळात निर्माण करण्याचे चालले होते.अखिल भारतीय अस्पृश्य परिषद १९३० जे पी निकाळजे यांच्या अध्यक्षतेखाली भरवण्यात आली .गोलमेज परिषदेला गणेश गवई यांचे नाव जावे यासाठी येथे प्रयत्न करण्यात आले .मात्र या अधिवेशनात गवई यांच्या या मनसुब्याचा पांडुरंग नंदराम भटकर यांनी त्वरित निषेध केला. बाबासाहेबंवरील त्यांची निष्ठा आणि विश्वास येथून प्रकट होते.
 डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आग्रहास्तव ८ आणि ९ ऑगस्ट रोजी दलित कॉंग्रेसच्या नावाखाली अखिल भारतीय परिषद नागपूरला बोलवण्याचे  निश्चित झाले .त्यानुसार नागपुरात ऑल इंडिया डीप्र्सेड क्लास्सेस कॉंग्रेस कॉन्फ्रन्स चे कार्यालय स्थापन करण्यात आले .या परिषदेची धुरा सांभाळण्यासाठी तयार करण्यात आलेल्या स्वागत मंडळामध्ये पांडुरंग भटकर यांचा समावेश होता .
    इतिहासकारांनी पांडुरंग नंदराम भटकर यांचा उल्लेख बाबासाहेबांचे कट्टर पुरस्कर्ते असं केला आहे.त्यात शंका नाही.परंतु बाबासाहेबाबरोबर व्यक्तिविकास नावाचा जो काही भाग असतो त्यानुसार पांडुरंग भटकर हे स्वतंत्र अस्तिवाचे धनी होते.बाबासाहेब ज्या गतीने समाज उद्धाराच्या कार्यात पुढे गेले टी गती जगातल्या कोणत्याही नेत्याला अजूनही साधता आली नाही .मात्र अनेकांनी बाबासाहेबांच्या या गतीला पूरक आणि समांतर असे काम केले आहे त्यात पांडुरंग नंदराम भटकर यांचे नाव अग्रणी आहे.अस्पृश्यांना कायदेमंडळात स्वतंत्र प्रतिनिधित्व असावे ही मागणी १९१० नंतरच्या काळापासूनची आहे.ज्या मागणीसाठी पांडुरंग भटकर यांनी वेळोवेळी सभांमधून आपले म्हणणे मांडले आहे.बाबासाहेबांनी येवले मुक्कामी बौद्धधर्माची दीक्षा घेण्याची घोषणा केली आणि त्याकाळातील हिंदू प्रतिगामी आणि विचारवंत अस्वस्थ झाले .अनेक ठिकाणी चर्चा झाल्या ,वाद झाले.बाबासाहेबांनी या विचारापासून परावृत्त व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात आले.बाबासाहेबांबरोबर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पदाची प्रलोभने देण्यात आली.या प्रलोभनाला अनेक कार्यकर्ते बळी पडले .मात्र पांडुरंग नंदराम भटकर यांनी सातत्याने बाबासाहेबांच्या निर्णयाचे विचारपूर्वक समर्थन केले.त्याकाळात अनेक व्यासपीठावरून भटकर यांनी बौद्धधर्म आणि धर्मांतर याविषयी बाबासाहेबांची बाजू मांडली.नागपूरला शंकराचार्य कुर्तकोटी यांनाही त्यांनी निरुत्तर केल्याचा प्रसंग आहे.
    बाबासाहेबांना जी एक मानवतावादी चळवळ उभी केली होती त्या चळवळीत अनेक विचारंची लोकं होती.एक वर्ग जो बाबासाहेबांना समकालीन होता,दुसरा वर्ग बाबासाहेबांच्या नेतृत्वाला सहाय्यभूत असं होता ,एक वर्ग हा बाबासाहेबांच्या चळवळीशी  समांतर राहून स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करू पाहत होता,एक वर्ग बाबासाहेबांचे तत्वज्ञान मान्य करून बाबासाहेबांना देवत्व बहाल करणारा वर्ग होता.पांडुरंग नंदराम भटकर याचं कार्य हे बाबासाहेबांच्या प्रत्येक कृतीला सहाय्यभूत असं आहे. खरे तर भटकर बाबासाहेबांना समकालीन आहेत,परंतु जो विचार आपण बाळगतो तोच मानवतावादी विचार बाबासाहेबासारखा माणूस प्रत्यक्ष अंमलात आणतो आहे ,याठिकाणी भटकर बाबासाहेबांचे कट्टर समर्थक ठरतात. पांडुरंग नंदराम भटकर यांच्या कार्याची इतिहासाने भलेही सूक्ष्म अशी दाखल घेतली नसेल परंतु परंतु त्यांच्या कार्याचा गौरव हा मोठ्या स्तरावरून झाला आहे. अलिप्ततावादाची चळवळ उभारून जगत शांतता नदवी यासाठी प्रयत्न करणाऱ्या पंडित जवाहरलाल नेहरू यांना अनेकदा अनेक देशांतून भारतातील अस्पृश्यतेबद्दल विचारणा केली जात असे.त्यात नेहरू निराश व्हायचे .परंतु भारतात अस्पृश्यतेसाठी खूप काम इथल्या लोकांनी केलं आहे यासंदर्भात नेहरू बोलत असत .त्यात अनेक मान्यवरांची नवेही ते देत असत.नेहरूंनी संविधान समितीच्या भाषणामध्ये अस्पृश्यातेसाठी काम करणाऱ्या लोकांमध्ये रावबहादूर श्रीनिवासन ,वीररत्न देवदासजी,किसान फागु बनसोडे यांच्याबरोबर पांडुरंग नंदराम भटकर यांचे नाव घेतले आहे.(constituent assembly debates : official report volumes 11.) ही बाब तर अभिमानास्पद आहे याशिवायही पांडुरंग नंदराम भटकर याच्या आयुष्यातील महत्वाची घटना म्हणून तिचा उल्लेख करता येईल. बाबासाहेब आणि माईसाहेब नागपूरला दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेण्यासाठी निघाले.स्टेजवर चढता चढता त्यांना पांडुरंग भटकर यांच्या आईने आवाज दिला.बाबासाहेबांनी ओळखलं आणि विचारलं साहेब कुठे आहेत. बाबासाहेबांची ही फार मोठी कृतज्ञताच आणि मोठेपण कि ते पांडुरंग भटकर यांना साहेब म्हणायचे. यापेक्षा अधिक कुठला मोठा ऐतिहासिक उल्लेख असेल. पांडुरंग भटकर हे निगर्वी नव्हते,महत्वाकांक्षी होते परंतु आक्रमक नव्हते.त्यांनी फार संयतपणे समाजासाठी कार्य केलं आहे आणि बाबासाहेबांना सहकार्य आणि साथ दिली आहे.
    नागपुरात विठ्ठल रामजी शिंदे यांचे एक वसतिगृह सुरु होते या वसतिगृहाचे संचालन त्यांनी शेवटपर्यंत सांभाळले.केवळ भौतिक संसाधनावर खर्च न करता प्रत्यक्ष दलित शोषित विद्यार्थ्यांसाठी खर्च व्हावा याबाबत ते आग्रही होते. जातीव्यवस्था ही मिश्र विवाहाने संपू शकतो हा त्यांचा विश्वास होता.अंबुबाई याच्यासोबत त्यांचा पहिला विवाह झाला होता .त्यांना एक मुलगा आणि दोन मुली होत्या .एक मुलगी पार्वताबाई आणि दुसरी शांताबाई.त्यांच्या शांताबाई या मुलीचे लग्नतत्कालीन महार जातीतील राष्ट्रीय कार्यकर्ते हेमचंद्र खांडेकर यांच्याशी झाले होते..१९३४ मध्ये ते अमरावतीला स्थायिक झाले. २४ मे १९६२ रोजी त्यांचा मृतू झाला.


डॉ.जगतानंद भटकर
सहा.संपादक
मराठी भाषा विभाग
महाराष्ट्र राज्य.

बुधवार, २५ ऑक्टोबर, २०२३

गाय आणि गाय

खुपदा वारंवार माझ्या बी.एड.पदवीच प्रमाणपत्र मी बघतो,त्यात गुण चांगले आहेत; पण माझं लक्ष जातं त्यावरच्या सहीवर. माझा मोठा भाऊ फार मोठ्या त्र्याग्याने बोलला होता, कि बरोबर पाय तुया मार्कसिटवर कसायाची सही हाय. मी ती सही पाहतो आणि मनाला समजावतो कि कसायालाही मुलबाळ असतील आणि तेही आपल्यासारखे शिकतच असतील. त्यांनाही पैसे लागत असतीलच.

गायीचं आणि माझं नातं हे मला समजायला तेव्हापासूनचं. आई मालिश करते मुलाची. तिचे स्निग्ध हात त्या मुलाच्या शरीराला आणि पुढे आयुष्यालाही शरीर देतात.बांधणी देतात. माझ्याही आईने माझी ही मालिश केली असावी. पण या मालिशपेक्षा माझ्या आयुष्याला अधिक स्पर्श झालाय तो गाय वासरांचा. तो स्पर्श आजही जाणवत राहतो. नुकतंच जन्मलेलं वासरू जवळ घ्यायचं आणि मग त्याने त्याच्या मऊ मुलायम आणि थोड्याश्या खरखरीत जिभेने आपलं पूर्ण अंग चाटत राहावं ,ही अशी वासराने केलेली मालिश अगदी बालपनापासून ते थोराड होईपर्यंत मी जगत आलोय. 

आजोबांनी दोन एकर शेत घेवून ठेवलं होतं. त्याबरोबर म्हैस आणि गाय घरी होतीचं. वडील गावातल्या दूध डेयरीत काम करायचे .त्यांचा असा दुधाशी संबंध होताच. घरी पेढे बनवायचे ते.पुढे जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकरी केली. फार कमी वयात नोकरी गेली त्यांची. त्यानंतरचे जगळे जीवन पुन्हा आईच्या कष्टावर आणि घरच्या गायी म्हैस यांच्यावरच निभावून गेले. आजोबा म्हैस घेवून शेतात जायचे. अगदी घोड्यासारखे ऐटीत त्या म्हैसेवर बसून त्यांचा हा प्रवास असायचा. पुढ्यात मी असायचो. म्हैस बोकांडली कि आपण पडू नये म्हणून आपले पाय टोंगळे म्हशीच्या पाठीत कसे रोवायचे याबद्दल मला सांगायचे ते मला. मांड रोवणे . साधारणता १९८५ चा काळ असावा. आजोबांनी टीबी हा आजार झाला होता. मला त्यांच्याजवळ झोपल्याशिवाय झोप येत नसे. आई वडील मला विनवायचे कि आबाजवळ झोपू नको म्हणून. मी चार वर्षाचा होतो तेंव्हा. एकदा गावातला पाटील घरी आला आणि त्याने आमची म्हैस विकत घेतली. आई नाराज होती. ती भांडत होती. खूप उंचपुरी म्हैस त्यावेळी ५००० हजार रुपयात आजोबांनी विकली. ५ रुपयांच्या त्या खूप साऱ्या हिरव्या नोटा आजही माझ्या नजरेसमोर येतात. या पैशातून त्यांनी आजारावर उपचार केले आणि पुढे विस वर्ष  आयुष्य जगले. पुन्हा घरी एक छोटी वगार घेतली आणि एक कालवडही घेतली.

गाय हा गावाच्या विश्वाचा एक खूप मोठा भाग. गावातल्या बड्या असामी माणसापासून ते रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरापर्यंत प्रत्येकाला गायीच्या अस्त्वित्वाचा स्पर्श होतो. गावातल्या दलगारात सगळ्या गायी आणि वासरे सकाळी गोळा केली जायची. गावातला गुराखी ही सगळी जनावरं मग दिवसभर गायरानात नदीकाठी चारायचा. संध्याकाळी हे दलगार सुटायचं आणि सगळ्या गायी परत आप आपल्या घरी येत. दलगारात सकाळी गायीला घेवून जाणे आणि संध्याकाळी दारातूनच तिला घरी येताना बघणे हा खूप मोठ्या आनंदाचा विषय असायचा. गाय जवळ आली कि तिच्या डोळ्यात अपार करुणा दिसते. पृथ्वीतलावर अशी अपार करुणा कोणत्याही प्राण्याच्या डोळ्यात दिसणार नाही. संध्याकाळी गाय घरी गोठ्यात आली तिच्या असण्याचं असं समाधान खूप असायचं.

आमचं गाव पूर्णा नदीच्या काठावर. खारपानपट्ट्यात वसलेलं. जुलैमध्ये शेतात पिक उमलून येतं आणि जानेवारीत अवघं शेत शिवार खाली होतं. ओलीत नसण्याने काळीभोर शेती उघडी पडते. जानेवारी ते जून हा तसा उन्हाचा काळ. निसर्गता गायीला उन्ह मानवत. उन्हात गायीला भटकंती आवडते. उलट म्हशीला पाणी आणि थंडावा लागतो. शेतं उलटली (उलंगवाडी)  कि गायीला मोकाट सोडण्याचा प्रघात होता आमच्याकडे. गायी दलगारात न सोडता मोकाट सोडायच्या. मोकाट सोडल्याने त्या अंगात भरायच्या आणि स्वतःच वाळलेलं गवत हुंगून खायच्या.आणि मिळेल तेथे पाणीही पितात. आणि या गावातल्या सर्व गायीचा स्वभाव फारच सरळ. आपल्याला मोकाट सोडलं म्हणजे आपलं गाव सोडून भलतेच कुठे गायी कधीच जात नसत. दिवसभर उन्हातानात फिरून झालं कि सगळ्या मोकाट गायी गावाशेजारी असलेल्या एखाद्या डेरेदार झाडाखाली रवंथ करीत बसलेल्या व उभ्या असायच्या. आपली गाय हुडकून काढायची असली कि लोक फक्त या झाडांखाली बघायचे. खात्रीने त्यांचे गाय वासरू कालवड तिथेच असत. मोकाटपनातली शिस्त या गायीनांच पाळता येत असावी कदाचित. आमची कबरी गायही अशीच. सरळ आणि साधी.

आजोबा सांगायचे त्यांचा एक कुणी गुरु होता. पूर्णा नदीच्या काठावर त्याने एक खोपडीवजा गुहा बांधली होती.त्यात त्याने चोवीस महिने ध्यान धारणा केली. त्याला बायकोही होती.त्याने ही ध्यान धारणा सोडावी म्हणून बायकोचा आग्रह होता. बायको त्याला भेटायला जायची. भांडायची. कधीकधी त्याची झोपडी तोडायची. तरीही तो बाधत नसे. तो चोवीस महिन्यापासून लिंबाचा आणि गोंधनचा पाला खाऊन हे सर्व ध्यान करत असे. भोन्डेश्वर या पूर्णा नदीवरील महादेवाचा तो भक्त होता. एकदा बायको म्हणाली काही खाऊन तरी साधना करा. बायकोच्या नव्हे त्या विनंतीला त्याने होकार दिला.एकदा तुझ्या हातचे अन्न खाईल म्हणून तो राजी झाला. एका पौर्णिमेला निरिच्छपणे त्याने ते जेवण घेतले. त्याची धारणा सुटावी म्हणून बायको खोटी बोलली कि मी तुमच्या जेवणात गायीचे मासाचे तुकडे टाकले होते. हे एक वाक्य त्याने एकले आणि त्याने जीव सोडून दिला. आजोबाचा हा गुरु गायीच्या माससेवनाच्या भीतीने आसमंतात विलीन झाला होता. आजोबासाठी गायीचे मास असे अभक्ष होते. पण आजोबा कसायाच्या जवळ गेले कि मला बैलाचेच असेल तर दे म्हणून आग्रह करायचे.बैलाच्या नावावर किती गायांचे मास आबांच्या पर्यायाने आमच्या पोटात गेले असेल. याची कल्पनाही करवत नाही. आजोबाचा त्यागी गुरु नजरेसमोर येतो आणि जगण्याच्या या सरळ सेवनमार्गात आपण किती अपराधीपण घेवून जगत आलोय याची वारंवार पोटात तिडीक उठते.

गावात डॉक्टर राहायचे. पती पत्नी दोघेही मलेरिया डॉक्टर म्हणून घरासमोर भाड्याने राहायचे. आले तेव्हा त्यांना एक मुलगी होती. हे डॉक्टर माझ्या आजोबांना खुपदा भेटायचे. एकांतात आजोबा आणि त्यांच्या काही देवघेवी चालायच्या. मी नेमका दहावीत होतो. आजोबा आणि त्यांना भेटायला येणारी माणस यांच्याबद्दल कायम मला वैर वाटायचं. आजोबा कुणाला बाळंतपणाचा काढा देत. अकोल्यातील एका मोठ्या दुकानातून ते कडू चिराइत नावाचे औषध आणत त्याच्या काही काही गोळ्या करत आणि त्याच त्या भेटायला येणाऱ्या लोकांना देत असत. या त्यांच्या निपुणतेमुळे लोकमानसात भानामती जादुगार अशी त्यांची प्रतिमा उभी करायचे लोक. हा मोठा इतिहास आहे. त्याचंही प्रचंड ओझं मनावर असायचं. गोळ्या जाळणे आणि लोकांना हाकलून देणे असे अनेक प्रयोग मी तेव्हा करायचो.तरीही आजोबांना डॉक्टरासारखा एखादा माणूस असा गुपचूप सापडायचाचं. कालांतराने डॉक्टरांना मुलगी झाली.या मुलीचा मी खूप लाड करायचो. पुढे ती दोन अडीच वर्ष्याची झाल्यावर डॉक्टर आमच्याकडेच मुलीसाठी दुधाला यायचे. कधी कधी रात्री बारा वाजता ते घरी यायचे. मोठ्याने आवाज देवून उठवायचे. आई घरातलं थोडं तूप कपात घ्यायची आणि गायीचा वया (आचळ) चोळायची. वया चोळून झाला कि गाय पान्हावत असे आणि मग एक गिलासभर दुध काढून डॉक्टर घेवून जायचे. गायीच्या दुध देण्याच्या वेळा दोनच.सकाळ आणि संध्याकाळ. पण आमची ही गाय अध्ये मध्ये केव्हाही दुध देत असे. डॉक्टरांचं रात्री बारानंतर दुध मागायला यायचं अनेकदा व्हायचं. आठवड्यातून दोन वेळा ते नक्की येत. मुलगी बारा वाजता उठायची. ती आधी सांभाळून ठेवलेलं दुध प्यायची नाही. डॉक्टर तडक येवून मोठ्याने आवाज द्यायचे. नंतर आईला गायीचा वळा चोळायचीही गरज पडत नसे. आई म्हणायची डॉक्टरांचा आवाज आला कि आता गाईलाच कळते कि दुध द्यायचे आहे म्हणून. डॉक्टरांचा आवाज एकूण गाय बहुधा आधीच पान्हावत असे. खूप भक्कम आधार वाटायचा तेव्हा त्या गायीचा.

(अपूर्ण )



 

 

श्रीज्ञानेश्वरी पदकोश

 ज्ञानेश्वरी या अभिजात ग्रंथातील ओवीनिहाय आलेल्या शब्दांचा आणि पदांचा कोश. ज्ञानेश्वरीतील कठीण शब्दांचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी या कोशाची साधन ग्रंथ म्हणून मोठी उपयुक्तता आहे.ज्ञानेश्वरीतील शब्द सामर्थ्याच्या निमित्ताने मराठी साहित्य आणि संस्कृतीचा तत्वज्ञान, धर्म, भाषा, लोकजीवन, समाज असा विविध अक्ष असलेला आलेख संस्थापित होतो. हा आलेख या पदकोशातून अधिक ठळकपणे अभ्यासकांच्या लक्षात येतो. या कोशात शब्दार्थ नाहीत तर, ज्ञानेश्वरीत जो ही शब्द, पद उपसर्ग, प्रत्यय अशा विकारासह आलेला आहे त्या प्रत्येक शब्दाची नोंद त्याच्या अध्याय आणि ओवी क्रमांकासह या कोशात घेतलेली आहे. अनेकदा तज्ञ् लेखक आपल्या मतांसाठी ज्ञानेश्वरीतील ओविचा उल्लेख करतात. वाचकांवर या ओवी संदर्भाचा विशेष प्रभाव पडतो. ज्ञानेश्वरीचा विशेष अभ्यास न करताही अभ्यासकांना हव्या त्या संदर्भाची ओवी या पदकोशातून शोधता येते. पैल तो गे काऊ कोकताहे ही एक साधी ओळ आहे. यातील काऊ हा शब्द ज्ञानेश्वरांनी आणखी कुठे,कितीवेळ कोणत्या ओवीमध्ये वापराला याचा शोध या पदकोशातून लगेच घेता येतो. असा प्रत्येक अन प्रत्येक शब्द या कोशात अध्याय आणि ओवीक्रमांकासाह संपादित केला आहे. शिवाजी नरहर भावे हे ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक. वि.का. राजवाडे यांचे सहाध्यायी. साधारणता 1920- 30 नंतर ज्ञानेश्वरीच्या अनेक स्थळप्रतीचा शोध राजवाडे यांनी घेतला. त्यातले पाठभेद लक्षात घेऊन ज्ञानेश्वरीचे संपादन करून त्याच्या परिष्कृत प्रती प्रसिद्ध केल्या. या प्रती प्रसिद्ध केल्यानंतर राजवाडे यांच्यासमोर ज्ञानेश्वरीतील शब्दार्थ प्रकट करण्याचे आवाहन होते. ज्ञानेश्वरीतील ओव्यांचे दाखले देत त्याकाळात अनेक निरूपणे, कीर्तने होत असत आणि या ओव्यांचे वेगवेगळे अर्थ दिले जात असत. अर्थाची ही विविध आणि विसंगत मांडणी राजवाडे यांना पटत नसे. म्हणून ज्ञानेश्वरीच्या ओवी ओवीचा तर्कशुद्ध अर्थच प्रकट व्हावा यासाठी राजवाडे यांनी ज्ञानेश्वरीचा शब्दार्थकोश तयार करायला घेतला होता. शब्दार्थ कोश तयार करण्यासाठी आधी पदकोश करावा लागतो. त्यासाठी त्यांनी पदकोशाचे कार्य हाती घेतले होते.


 

 पण त्यांच्या प्रकृतीस्वास्थामुळे हे कार्य त्यांच्या हयातीत पूर्ण झाले नाही. वर्ध्यातील शिवाजी नरहर भावे यांनी या कार्याची जबाबदारी घेतली आणि ज्ञानेश्वरी पदकोश आणि ज्ञानेश्वरी शब्दार्थकोश हे दोन्ही प्रकल्प पूर्ण केले. प्राचीन मराठी साहित्यातील ओवी, अभंगाचे अर्थान्वयन करणे कठीण कार्य असते. वैदिक संस्कृत साहित्यातही अर्थामधली ही विविधता आढळते. मूलतः हे साहित्य धार्मिक भावनेशी निगडित असल्याने त्यात अर्थ हा विविध पद्धतीने येऊ नये यासाठीही बरेच कार्य केलेले आहे. वक्ता बोलत असताना एखादा ओवीच्या अर्थात संधिग्धता जाणवत असेल तर श्रोता लगेच समोरासमोर वक्त्याला प्रश्न विचारू शकतो. पण ग्रंथानिविष्ट ओव्या वाचताना तिथे अर्थ नीट लागत नसेल तर विचारायचे कुणाला? अशावेळी हे पदकोश उपयोगी पडतात. संस्कृतचे थोर अभ्यासक नारायणशास्त्री मराठे यांनी मीमांसाकोश नावाचा एक संस्कृत पदकोश संपादित केला आहे. संस्कृतसाहित्यात उपयोजित शब्दाचे उपयोजनानुसर तर्कशुद्ध अर्थ या कोशात संपादित करण्यात आले आहेत. भावे यांनी संपादित केलेला हा पदकोश अर्थान्वयासाठी उपयुक्त आहे. मराठी भाषेचे आणि संस्कृतीचे शब्दसामर्थ्य या कोशातून दृष्टीस पडते. देशीकार लेणे असे पद एका ओवीत आहे. यातील लेणे हा शब्द अनेक ठिकाणी ज्ञानेश्वर वापरतात.या कोशामुळे प्रसंगानुसार आणि उपयोजनानुसार लेणे शब्दाचे विविध अर्थ लावता येतात. या कोशामुळे लेणे या शब्दाचे ज्ञानेश्वरीतील पूर्ण उपयोजन समोर येते. ज्ञानेश्वरकालीन मराठी भाषेचा तत्वज्ञान, धर्म, विज्ञान, समाज, उद्योग अशा अनेक विद्यशाखांशी असणारा परिचय या कोशातून लक्षात येतो. ज्ञानेश्वरांनी अगदी कोवळ्या वयात हे भाष्य आविष्कृत केले आले. ज्ञानेश्वरांची लोकविलक्षण प्रतिभा या कोशातून आपण अनुभवू शकतो.

पुस्तकं


गाडीतल्या डिक्कीतली
पुस्तकांची चळत काढली
आणि हातात चॉकलेट ठेवतात तशी
ती पुस्तकं ठेवली पुतण्याच्या हातात.
गाव आता टुरिस्ट स्पॉटसारखं झालंय
आणि वाडवडिलांच घर म्हणजे बजेटमधलं लॉज.
त्यामुळे देण्याघेण्याचं हे दांभिक दायित्व
घडून येतंआपोआप.
पुतण्या वरमला.
एक घालमेल होती त्याच्या चेहऱ्यावर गडद.
अनेको पुस्तकांचा विषय होईल अशी.
चॉकलेटची ख़ुशी हा विषय शून्य होता तेथे.
निघताना जवळ आला,
म्हणाला काका पुस्तकं वाचून काय होईल?
बाप दिवसभर दारू पिऊन पडलेला असतो गल्लीत,
आई घर सोडून निघून गेली
लोकं म्हणतात तिनं दुसरा नवरा केला.
छोटी बहीण आहे तिसरीत
ती शाळेत जात नाही, स्वयंपाक करते आमच्यासाठी.
मी सहावीत आहो, पण निंदायला जातो,
सोमवारी मजुरी भेटते म्हणून.
काका, हे पुस्तकं वाचून काय होईल?
माई आई येईन का घरी?
बाप सोडीन का दारू पिणं?
मले अन बहिणीले जाता येईन का शाळेत?
टुरिस्ट स्पॉटवरच आलो होतो मी
प्रश्नांच्या या धबधब्याखाली थिजून गेलो क्षणात.
याचं प्रश्नांत थिजलेल्या त्या इवल्या मुलाला
बाहेर काढण्यापेक्षा मी निघालो सकट पुढे.
मुलाच्या बापाला
कुणीही पुस्तके न दिल्याचा कोरा इतिहास
मी जपून आहे माझ्या मनाच्या पानापानात.

 

संगीताबाई

 

मुलगा झाला नाही म्हणून
होणारं दुःख लपविण्यासाठीच
मी मुलगी झाल्याचा आनंद तर
साजरा करीत नाही ना?
अशा संशयी नजरेनेच बघत होते
नातलग माझ्याकडे.
घरात नवीन जीव आलाय
या एका घटनेने मी खराच आहे आनंदी
फक्त एवढंच की,
राकेश शर्मा, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर
धोनी, विराट कोहली ही नाव जरा
धुसर झाली माझ्या नजरेसमोर.
आणि एकाएकी तरळू लागलेत चेहरे
इंदिरा गांधी, सुनीता विलीयम्स, किरण बेदी
कल्पना चावला,पी सिंधू असे काही काही.
मुलगी मोठी होत आहे,
आणि हळूहळू बोबडी बोबडी बोलती आहे.
मी सजवून ठेवले आहेत
तिच्या अवती भवती असे मोठं मोठे फोटो.
काल तिने अचानक विचारलचं
पपा हे फोटोतले लोकं कोण?
मी अतीव हर्षाने तिला सांगत होतो
ह्या जगातल्या खूप मोठ्या स्त्रिया
ज्यांच्या कामाने उजळून गेलंय जग
उद्या तुलाही व्हायचं आहे ह्यांच्यासारखं मोठं.
तिला काय समजलं, मला कळलं नाही.
मुलगी काल अचानक जवळ आली
आणि म्हणाली 'पपा मी संगीताबाई होऊ का?
संगीताबाई आपलं घर किती नीट स्वच्छ करते.
आणि एका वाक्यातचं मुलीने
उघडं केलं माझ्यातलं जनावर
श्रेष्ठत्वाचे सालस बुरखे पांघरून
समाजात समंजस्यपणे वावरणारं.
 
 
डॉ. जगतानंद भटकर

कविता

प्रत्येक मुलीकडे
एक कविता असली पाहिजे
तिने ती लिहली असेल
वा लिहली नसेल तरीही.
जागचंही न हलणारं
हे अती अतिभव्य जग
थोडं हलवायचं आहे,
ढवळायचं आहे त्याला.
वर खाली करायचं आहे.
काहीही करून कसंही करून.
 
 
 
रिचर्ड ब्राईटिंगन
भावानुवाद : जगतानंद भटकर

 


 
 
 
 

गाईपण

 

गायीला सोट आले की
वडील गायीला भरून आणायचे
मग गाय पोटुशी राहायची
काही दिवसातच वासराला जन्म द्यायची.
मग गायीचं वासरू
मग गायीच्या कोऱ्या दुधाचं खिरुज
मग गायीचं धारोष्ण दूध
मग गायीच्या दुधाचं दही
मग गायीच्या दुधाचं तूप
मग जीवन गाईमय व्हायचं
जीवन आईमय असतं तसं.
एखादवेळी गायीला सोट यायचे
आणि गाय गोठ्यातून निघून जायची
वडील नेसत्या कपड्यात
गायीला शोधायचे रानावनात
बिनचपलेने धावायचे नदीचे काठ
उमटलेल्या खुरामागे चालायचे दिनरात.
मुलीने घरून पळून जावं
आणि बापाने धुंडळावा सगळा अवकाश
असंच काहीतरी व्हायचं.
पण गाय सापडायची, सापडायची तिथे.
वडील गायीला घरी आणायचे
मग तेच दूध, दही, तूप आणि अधिक काही.
गायीचं हे बोकांडनं खपत नसे कुणाला
वडील असतात तिथेच ठाम की
गायीला सोट आले की
आपणच तिला भरून आणायचं.
गायीचं गाईपण आपण कधीच मान्य केलं नाही.
अनादिकाळापासून.
 
 
डॉ. जगतानंद भटकर

आता आणखी

आता आणखी एखाद्याही बाळाला
मारायच्या आधी, एक करा.

ज्या मातीत दाणे उगवून आले
ज्या दगडातून नद्यांना झरे फुटले
ज्याने तूम्ही तृषार्थ झालात
ती माती, ते झरे नष्ट करा.
फोडून काढा ते सगळे दगड,
ते स्तंभ, ते लेख, शिलालेख
ज्यावर लिहलाय तूम्ही
तुमचा तथाकथित इतिहास.
खचवूनन टाका त्या सर्व गुहा
जेथे तूम्ही पहिला उजेड अनुभवलाय.
सगळी तत्त्व खोटी असल्याची द्वाही पिटा.
झाडाच्या सावलीला बोल लावा.
बुध्दाचे बोधिसत्व, गोवर्धनाचा आधार
ख्रिस्ताचे शुभवर्तमान आणि पैगंबराचे उपवास
हे सगळं दांभिक असल्याचं जाहीर करा.
आणि देव रस्त्यावर ठेवा बेवारश्यासारखे.
घरात काही ग्रंथ असतील
गुंडाळून ठेवलेले
ते जवळच्या कोणत्याही नदीत बुडवून टाका
पुन्हा वर येऊ नयेत या व्यवस्थेसह.
मन, मान आणि मेंदू
असं काही अस्तित्वातच नाही
मनगट तेवढं आहे हे पटवून द्या.
ते पि्रॅमिड्स, ते लेण्या,
ते ताजमहाल,ते युनिटी, लिबर्टी
इकव्यालिटीचे स्टॅचू
सगळं उध्वस्त करा.
एक एक व्यक्ती नष्ट करा
जो बोट दाखवतोय, दिशा दाखवतोय.
आदम आणि इव्ह,
प्रेम आणि स्पर्श
हे थोतांड असल्याचं सिद्ध करा.
 
आता आणखी एखाद्याही बाळाला
मारायच्या आधी, एक करा.

शुक्रवार, २० ऑक्टोबर, २०२३

Katyayani

Katyayani

Indian goddess. She is the sixth among the Navadurgas, the nine forms of Hindu goddess Durga who are worshipped during the festival of Navaratri. 

There are many origin stories of this goddess. At the time of the killing of Mahishasura, the gods were first defeated. They became very sad. On this occasion Katyayanamuni hear about this defeat, he called all the gods to his hermitage, gathered all their effulgence and mixed with it the effulgence of his penance, he produced a goddess for demons ends (Daityavadha).  That deity was named Katyayani.  Because she was produced by Katyayanamuni.  The form of this goddess is similar to Dashabhuja Durga and her vehicle is lion.

Katyayani goddess have three-eyed, quadrilateral holding and shankh-chakra-khadga-trishul.  It is said in Vidyanarnava Tantra that it should be Simhavahini. The Matsya Purana says that she should be ten-armed and sited on lion when she kills Mahishasura.

In search of Mahishasura, Goddess Katyayani came to Vindhyachal mountain, Ashtabhuja also came to Vindhyachal mountain, settled and took the name of Vindhyavasini.  Goddess Durga came to investigate on Mount Vindhya itself and killed the remote demon.  From these stories, one can infer that when the Aryas moved down from North India to South India during their migration, it was only then that they had to contend with the earlier Anaryas.  At that time, the need for Shaktidevata was more felt.  Many shakti deities must have been created around this time.  Chandamunda was also an Aryan descendant living on the south side of Vindhyachala.  If we can say exactly what this period is, then the time of origin of many gods can be definitely understood. 

 

The name of this goddess is included in the first four Shaktipeeths.  Udiyan, Kamagiri, Kamakhya and Jalandar are the first four Shaktipeeths, of which Katyayani Devi was established in Udiyan.  At that time there was an independent kingdom in Udiyan and a king named Indrabhuti was ruling there.  This period should be after the Mahabharata and between the Buddhist period.  Eventually this area came under the Yavani rule and this Peetha was destroyed. This goddess has a place in the list of 51 shaktipeeths.  In Vrindavan or Kesjal Peetha, Sati's hair fell and hence it got the name Kesjal.  Bhootesh or Krishnanath is the Bhairava of this place.
 

As another origin the demon Mahishasura established his power over all the planets.  Not only this, he also took away Indrapada from Indra.  Naradamuni told this news to Kartikswamy.  Swami created a woman with his effulgence and asked her to destroy Mahishasura.  Kartikswamy gave birth to her so named Katyayani.

रविवार, १७ सप्टेंबर, २०२३

रमश्या

रमश्या उतरायचा ढगासारखा
रहदारीच्या मधोमध ठोकायचा पाल
थाटायचा ऐरणीवर संसार.
रमश्या पंचाई.आडनाव कधी कळलं नाही.
मायबाप डेऱ्यावर सोडून, बायको पाठी घेऊन
तो प्यायचा असं बारा गावचं पाणी.
तो विळ्याला धार लावायचा
कुऱ्हाडीला पाणी द्यायचा
पास आणायचा पट्ट्यात.
गावातल्या आभाळभर हिरवाईला
रमश्या द्यायचा धगधगून सोबत.
बचत बँक म्हणून तो रोवायचा
पालाच्या मधोमध प्लास्टिकचा डबा
कसायचा आधाराच्या कसकसून दोऱ्या
सजवायचा तांब्या जर्मनची भांडी.

लांबला मुक्काम ढगांची वाट पाहत की
रमश्या होऊ पाहायचा सेक्युलर
दिसाव्या अशा पोझमध्ये लावायचा
नजरेसमोरचं देवाचे फोटो
नाचायचा गणपतीत अवघडून
उधळायचा गुलाल नीळ वैगेरे.
उसन्या चेहऱ्याने जपायचा माणसे
लग्नात घुसायचा ,जेवायचा, वाढायचा.
कुणाला दाजी ,कुणाला मामा. काका म्हणायचा.

कधी कधी घुसमटून यायचं
नको असलेलं गणगोत बायकोभवती
रमश्या सोसायचा,राख करायचा.
आणि बरोबर घ्यायचा तंतोतंत
हातोड्याच्या आणि एरणीच्या मध्ये
अशी माजूर्डी भावना.

ढग येत राहायचे जात राहायचे
रमश्याही येत राहायचा ,जात राहायचा .
अलीकडे  असा रमश्या मला इतरत्र कुठे दिसत नाही
अदृश्य झाल्यासारखा वाटतो.
मी विचार करत राहतो
रमश्याच्या प्लॅस्टीकच्या बँकेबाबत
त्याच्या सेक्युलर अवघडलेपणाबाबत
आणि एकाएक दाटून येतं की
रमश्या आपल्यातच तर नाही ना दडून बसलाय ?
आपणही हिंडतोच आहोत की पोटापाण्यासाठी
बारा गावाचं पाणी पीत.

डॉ. जगतानंद भटकर

गुरुवार, १७ ऑगस्ट, २०२३

असते काय

असते काय तर स्पर्मिकल कम्पीटीशनचंं
शेवटी सुटका नाही माणसाची माणसापासून.

माझ्या लहानगे मुली

माझ्या लहानगे मुली

डावावर लावायचे
नाहीतर वस्त्रहरण करायचे
वनवासात पाठवायचे
नाहीतर अपहरण करायचे
वेदनांच्या अपरिहार्य बेसरबिंदीने
टोचले जाऊ नये तुझे नाक
यासाठी मी टाळत फिरतो
अवघ्या सोनारगल्ल्या.

आताशा तुझे इवलुशे पाय
जिथे पडतात  तिथे,
मी अंथरतो माझे काळिज
मोकळा श्वास घेता यावा म्हणून
तुला जोजावत राहतो
माझ्या एयरकंडीशनर कुशीत.

माझे लहानगे मुली
मी जीवाचे कान केलेत तुझ्या जन्मापासून
तुझ्यातली गार्गी,सावित्री,रमाई ऎकायला
अवती भोवतीच्या मुन्नी ,लैला
अन् कुण्या शालु अनारकलीच्या
गोंगाटातही.

कुठला बाप काढतो विकायला

स्वतःच्याच मुलीला किंवा करतो खूनच तिचा?

कुठले मायबाप संगनमत करून
जन्मापूर्वीच करतात कत्तल तिची?
आता तर तपासूनच पहावी 
लागेल माणसाची आदिमता.
उपटून फेकावेच लागतील
बाप नावाच्या संस्कृतीने
माणसात ओतलेले जनावरांचे जिन्स.

माझे लहानगे मुली
पृथ्वीच्या पोटात सामावल्याने
तुझी क्षमता सिद्ध होणार नाहीये
तुला यावचं लागेल रस्त्यावर
सावित्रीसारखं शेण झेलत
अखिल संसर्गाचे आकांत पोटात घेऊन.
बोबडं का होईना तुला शिकावं लागेल
मुक्ता साळवेसारखं बोलायला.
माझे लहानगे  मुली
तुला सज्जच व्हावं लागेल आता
तुझ्या इवल्याशा बोटावर
ही अवघी पृथ्वी तोलायला!!

संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश


मनुष्यजातीच्या मुखांतून जे जे म्हणून सार्थ व संपूर्ण विधान शब्दरूपाने भूत, वर्तमान व भविष्यकाली बाहेर पडले, तें तें सर्व साहित्य होय अशी इतिहासाचार्य राजवाडे यांनी साहित्याची व्याख्या केली आहे. हा सगळा साहित्य व्यवहार समाजगत असतो. समाजाचे आणि पर्यायाने राष्ट्राचे एक मूल्याधिष्ठित चित्र साहित्य व्यवहारातून प्रकट होते. ही बाब डोळ्यासमोर ठेवून प्रारंभापासून ते आजपर्यंतच्या मराठी साहित्याचा परिचय करून द्यावा या दृष्टीने प्रस्तुत मराठी वाङ्मयकोश या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. साहित्याचा अभ्यास करणारे विद्यार्थी, अभ्यासक आणि सर्वसामान्य वाचक यांना डोळ्यासमोर ठेवून या कोशाचा आराखडा तयार करण्यात आला. मराठी साहित्यात लक्षणीय असणारे सर्व ग्रंथकार, ग्रंथ, पंथ, संप्रदाय, चळवळी, नियतकालिके, साहित्यसंस्था, प्रकाशनसंस्था, मुद्रक, वाङ्मयीन प्रवाह, समीक्षेतील संज्ञा इत्यादी विषयीच्या नोंदी या कोशात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

सदानंद भटकळ, जया दडकर, प्रभा गणोरकर आणि वसंत आबाजी डहाके या मातब्बर मराठी साहित्यविषयक तज्ञ मंडळींनी या कोशाला आकार दिला आहे. खरे तर या कोशांच्या निर्मितीमागे एक दु:खार्थ आणि भावनिक प्रेरणा आहे. या वाङ्मयकोशाची मूळ संकल्पना भटकळ फौंडेशन या मराठीतील प्रतिथयश प्रकाशन संस्थेचे विश्वस्त सदानंद भटकळ यांची. साधारणतः १९४० पासून प्रकाशन व्यवसायात कार्य करणारे सदानंद भटकळ यांनी ग.रा.भटकळ यांच्या जन्मशताब्दी निमित्त या प्रकल्पाची आयोजना केली. १९९५-९६ या साली हा प्रकल्प सुरु झाला. मात्र त्याच काळात भटकळ यांना कर्करोगाचे निदान झाले. आलेल्या परिस्थितीशी सामना करत त्यांनी डॉक्टरांशी सल्लामसलत केली आणि आपल्याला जो ही जीवितकाळ मिळेल त्या काळात  संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश या प्रकल्प पूर्ण करावा असे ठरविले. याच प्रेरणेतून हा प्रकल्प पूर्ण झाला. श्रीमती जया दडकर यांनी त्यांना मोलाची साथ दिली. संपादक ,लेखक आणि समीक्षक म्हणून प्रभा गणोरकर आणि वसंत आबाजी डहाके यांनी या कोशाची कार्यपूर्ती केली. प्रभा गणोरकर आणि वसंत आबाजी डहाके हे दोघेही  मराठीच नव्हे तर भारतीय आणि जागतिक साहित्याचे प्रगाढ अभ्यासक. दोघांचाही मराठी साहित्यातील प्रत्येक सूक्ष्मतम घटकांचा अभ्यास असल्याने त्यांनी या कोशाला एक कष्टसाध्य अशी सर्वसमावेशकता दिली आहे. संक्षिप्त मराठी वाङ्मयकोशाचे हे प्रचंड काम तीन खंडांत पुरे केले गेले आहे. मराठी भाषा आणि साहित्याच्या आरंभापासून इ.स. १९२० पर्यंतच्या कालखंडातील साहित्यविषयक नोंदींचा प्रथम खंड आणि इ.स. १९२० नंतरच्या आजपर्यंतच्या साहित्याविषयीच्या नोंदींचा दुसरा खंड आणि वाङ्मयसमीक्षा-संज्ञाचा तिसरा खंड असे या कोशाचे स्वरूप आहे. वाङ्मयीन संज्ञा संकल्पना कोश या खंडाचा यथावकाश स्वतंत्र परिचय करून देईल. या कोशाच्या निर्मितीसाठी ऑक्सफर्ड कम्पनिजन टु इंग्लिश लिटरेचर' आणि 'केंब्रिज गाईड टु लिटरेचर इन इंग्लिश हे दोन ग्रंथ नजरेसमोर होते. मराठी वाङ्मयकोश खंड पहिला मराठी ग्रंथकार इ.स. १०५०-१८५७ या शीर्षकाचा श्री. गं. दे. खानोलकर संपादित वाङ्मयकोश महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळाने १९७७ साली प्रकाशित केला होता. या कोशात केवळ ग्रंथकारांविषयीच्या नोंदी आहेत. त्यामुळे वाङ्मय इतिहास आणि स्वरूपाच्या दृष्टीने या कोशाला मर्यादा होत्या. खानोलकर, वि. ल. भावे, पांगारकर, अ. ना. देशपांडे या प्रभूतिनी मराठी साहित्याचा समग्र इतिहास लिहिला आहे. मात्र त्याचा व्याप केवळ लक्षात घेवून संक्षिप्तपणे वाचकांना हा समग्र इतिहास देता यावा हा हेतू ठेवून या कोशाच्या पहिल्या दोन खंडात मराठी साहित्याचे समग्र चित्र रेखाटलेले आहे.

लेखन, मुद्रण, प्रकाशन आणि वितरण या वाङ्मयव्यवहारातल्या चार पायऱ्या आहेत. चारही पायऱ्यांशी निगडित अशा व्यक्ती आणि संस्थांविषयीच्या नोंदी या कोशात घेतल्या गेल्या आहेत. साहित्यविश्वाच्या पर्यावरणात प्रत्येकाचे काही एक स्थान असते त्यामुळे  मराठी वाङ्मयव्यवहाराचे यथार्थ आकलन होण्यासाठी मराठीतल्या एकूण एक लेखनाची नोंद या कोशात घेण्यात आली आहे. प्रत्येक नोंद ही परिपूर्ण असली आहे;परंतु तिचा  विस्तार फार नाही, आवश्यक त्या सर्व गोष्टी येथे दिल्या आहेत. त्या त्या ग्रंथकाराचे अथवा साहित्यकृतीचे व्यक्तिमत्त्व मूर्त होईल एवढा मजकूर देवून एक संक्षिप्तता येथे जपली आहे.

दोन्ही खंडांना आमुख म्हणून विस्तृत आणि प्रदीर्घ प्रस्तावना वसंत आबाजी डहाके यांनी लिहिल्या आहेत. मराठी साहित्याचे एक प्रकट आणि विश्लेषक चित्र या प्रस्तावना रेखाटतात. मराठी साहित्य आणि इतिहास या संदर्भात संदर्भ मर्यादा हा एक मोठा विषय आहे. मूळ प्रत, लेखकाचे छायाचित्र अशा मर्यादा टाळून हा कोश अधिकाधिक सचित्र करण्यात आला आहे. अनेक ग्रंथकारांची छायाचित्रे या कोशात पाहायला मिळतात. मराठी साहित्य आणि संस्कृतीचा एक कोशात्म असा परिपूर्ण लेखाजोखा या कोशातून मांडला आहे.

सदानंद भटकळ यांच्या कर्करोगाच्या निदानाने या कोशाच्या निर्मितीला एक भावनिक अंग होते. या कोशाच्या  निर्मितीच्या ओढीने त्यांनी त्याकाळात कर्करोगावर मात केली होती. प्रभा गणोरकर या फार तटस्थ अभ्यासक. कोशाचे कार्य गांभीर्याने आणि सखोल संदर्भ शोधून करायचे या भूमिकेवर त्या ठाम होत्या. सु. रा.चुनेकर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध कोश अभ्यासक. त्यांनी या कोश कार्याबद्दल सकारात्मक मत दिले आहे.

मराठी साहित्याचा अभ्यास करणाऱ्या आणि जिज्ञासू यांच्यासाठी संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश या कोशाचे हे पहिले दोन खंड अत्यंत मोलाचे आहेत.

 

भारतीय संस्कृतिकोश

 

भारतीय संस्कृतिकोश


भारताची संस्कृती ही विविधांगी आहे. काळ, प्रदेश, भाषा, साहित्य अशा अनेक घटकांनी ती पृथगात्म झाली आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या प्रारंभकाळातच या बहुआयामी संस्कृतीचे संवर्धन झाले पाहिजे यासाठी काही संस्थात्मक प्रयत्न करण्यात आले. साहित्य अकादमी, नाट्य अकादमी, ललितकला अकादमी विविध कलासंस्था भारत सरकारने त्यासाठी निर्माण केल्या. आकाराने विशाल मात्र निरनिराळ्या संस्कृतीबद्ध आचारांनी भारतातील असंख्य समूह आपले जीवनयापन करत आहेत. मानव हा सभोवतीच्या निसर्गात किंवा निसर्गातल्या पदार्थांत आपल्या जीवनाला अनुकूल आणि उपयुक्त असे बदल करून किंवा प्रसंगी त्यांच्यावर इष्ट ते संस्कार करून आपली जीवितयात्रा चालवत असतो. अशी इरावती कर्वे यांनी संस्कृतीची व्याख्या केली आहे. मानव जीवनाच्या अनुकूलतेकडे सातत्याने प्रवास करत आला आहे. या प्रवासाला त्याच्या स्वभाव, प्रदेश, निसर्ग, आचारविचार, तत्त्वज्ञान, कार्य अशा अनेक घटकांनी व्यापलेले असते. हा व्याप अगदी प्राचीन काळापासून ते आज आतापर्यंत कार्यरत असतो. भारतीय संस्कृतीचे असे व्यामिश्र तरीही एकसंध असे चित्र कोशात शब्दबद्ध करावे या हेतूने भारतीय संस्कृतीकोशाची निर्मिती करण्यात आली आहे. शीर्षकानुसार भारतीय संस्कृतीतील एकूण एक घटकांची सारबद्ध आणि ससंदर्भ माहिती या कोशात विविध नोंदीतून देण्यात आली आहे.  

सांस्कृतिक प्रयत्न म्हणून या कोशाच्या निर्मितीसाठी १९५७ साली भारतीय संस्कृतीकोश मंडळाची स्थापना करण्यात आली. कोशकार्यात मुलभूत कार्य करणारे तज्ञ या मंडळाचे संस्थापक सभासद होते. त्यामध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, डॉ. रा. ना. दांडेकर, श्री. अ. ह. लिमयें, श्री. शं. वा. किर्लोस्कर,श्री. बा. वा. पोतदार, प्रा. न. र. फाटक, श्रीमती दुर्गा भागवत, श्री. वि. पु. भागवत,प्रा. गोवर्धन पारीख, श्री. काशीनाथ नायक, श्री. चि. ग. कर्वे, बा. ग. जगताप,श्री. सि. ग. फडके, श्री. चि. श्री. नातू, श्री. जयंतराव टिळक, डॉ. ग. वि. देसाई, पं. महादेवशास्त्री जोशी, सौ. पद्मजा होडारकर अशा मान्यवरांचा समावेश होता.  संस्कृत, पाली, हिंदी, मराठी, गुजराती, बंगाली, कन्नड, तेलुगु, तमिळ, इ. देशी भाषांतील आणि इंग्रजी आणि परदेशी भाषांतील भारतीय संस्कृति-विषयक ग्रंथसंपत्तीचे अवलोकन करून त्या आधारे 'भारतीय संस्कृतिकोश' या नांवाने भारतीय संस्कृतीचा व्यापक आणि तपशीलवार ज्ञानकोश मराठी व हिंदी या दोन्ही भाषांत तयार करणे, हा या मंडळाचा उद्देश होता. केवळ सांस्कृतिक विषयांना वाहिलेला एक तपशीलवार व व्यापक कोश निर्माण करण्याचा उद्देश असल्याने हे महत्वाचे कार्य ठरले.

 संघर्ष, समन्वय, सामंजस्य आणि एकात्मता या क्रमाने भारतीय संस्कृती आकारास आली आहे. भारतात वास्तव्य करणाच्या जातीजमातींनी देश-काल-परिस्थितीला धरून आपापल्या सांस्कृतिक आविष्कारांच्या विविध पद्धती निर्माण केल्या आहेत. धर्म, पंथ आचार, विचार, श्रद्धा-संकेत, पूजास्थाने, देवता, यात्रा, उत्सव, व्रते, पर्वे, साहित्य, नृत्य, नाटघ, शिल्प चित्र, त्याचप्रमाणे सामाजिक आणि कौटुंबिक चालीरीती, अशा असंख्य प्रकारांनी या विविधतेने विस्तृत रूप धारण केले आहे. भारतीय संस्कृतीचे हे विस्तृत रूप या कोशात पहावयाला मिळते.   



संस्कृतीची निर्मिति, तिचा संचय व एका पिढीतून दुसऱ्या पिढीत, दुसरींतून तिसरीत अशी तिची संक्रांती होत जाणे म्हणजे संस्कृतीची परंपरा होय. संस्कृती ही एका व्यक्तीची नसून ती समाजाची असते. व्यक्तीचें जीवन मर्यादित व अत्यल्प असतें; तर समाजाचे जीवन प्रदीर्घ व मोठ्या प्रदेशावर विस्तारलेलें असतें. संस्कृती ही व्यक्तीच्या आयुष्याची दिशा निश्चित करते; तर व्यक्ति युगधर्माला अर्थात् देशकालाला अनुसरून संस्कृतीचा प्रवाह बदलीत असते. हवा, पाणी, सूर्यप्रकाश या गोष्टी जितक्या सहजतेने मानवाच्या जीवनांत सोबत करतात, तितक्याच सहजपणे संस्कृतिही मानवाचे अंतर्बाह्य जीवन व्यापून राहते. या उदात्त विचारांना समोर ठेवून भारतीय संस्कृतीचे संपूर्ण संकल्पनाचित्र या कोशात रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे.

भारतीय संकृतिकोशाचा पहिला खंड १९६२ मध्ये प्रकाशित करण्यात आला. या कोशाचे एकूण दहा खंड प्रकाशित झाले असून दहावा खंड १९७९ मध्ये प्रकाशित झाला आहे. या दहा खंडांमध्ये एकूण १२७१९ एवढ्या नोंदी प्रकाशित झाल्या आहेत. त्या १४० घटक विषयात विभागल्या आहेत. नोंदीचे स्वरूप सूक्ष्म,दीर्घ आणि व्याप्तीलेख या स्वरूपाचे आहे. वीस वर्ष या विस्तृत काळामध्ये या कोशाच्या निर्मितीचे कार्य चालू होते. धर्म, तत्त्वज्ञान, इतिहास अशा विषयांशी संस्कृतीचा सातत्यस्पर्श असल्याने या कोशातील नोंदी ह्या परिपूर्ण आणि आश्वासक आहेत.  या कोशाच्या द्वारे भारताच्या विविध सांस्कृतिक परंपरांचें, प्रवाहांचें आणि आविष्क साररूप पण सर्वांगीण दर्शन वाचकांना आणि जिज्ञासूंना घडावे, हेच या कार्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

त्यास अनुसरूनप्रस्तुत कोशांत पुढील घटकांची तपशीलवार माहिती दिली आहे- विषय पुढीलप्रमाणे - यज्ञसंस्था, वैदिक संस्कार, प्रांतीय व अखिल भारतीय सण व उत्सव, तीर्थे, क्षेत्र व सरोवरें, नद्यांचं माहात्म्य व त्यांचा परिचय, भारतांतलीं सुप्रसिद्ध देवस्थानें, स्मार्त, पौराण इ. सर्व प्रकारचीं प्रायश्चित्तें, अग्नि, जल इ, विविध प्रकारचीं दिव्यें, देव-देवतांच्या पूजा आणि बलिदानें,शुभाशुभ मुहूर्त, पौराणिक व्रतें, अरिष्टनिवारणार्थ सर्व प्रकारची भारतांतील सर्व जातीजमाती, भारतातील सर्व आदिवासी जमाती, जातिसंस्था, तिचा उगम, विकास, अस्पृश्यतेचा इतिहास, निसर्गोपासना,  संत व राष्ट्रपुरुष जन्मोत्सव व पुण्यतिथी, आस्तिक-नास्तिक दर्शनें, पंथोपपंथ, विद्या व कला, स्मृति, पुराणें, उपपुराणें आणि महाकाव्यें, वैदिक, पौराणिक व ऐतिहासिक राजवंश, प्रादेशिक भाषा, त्यांचा विकास, साहित्य व लोकसाहित्य, संस्कृत, प्राकृत, पालि, अर्धमागधी, प्रांतिक भाषासाहित्य, शास्त्रीय नृत्ये व लोक नृत्यें, मूर्तिकला, चित्रकला व तिच्या प्रादेशिक शैली, वेषभूषा व अलंकार, स्थापत्यशैली, शास्त्रीय संगीताचीं, ग्रामीण व आदिवासींची वाद्ये इत्यादी.

भारतीय संस्कृतीचे एक व्यापक चित्र या कोशातून उभे झाले आहे. अभ्यासक,विद्यार्थी आणि जिज्ञासू वाचकांसाठी हा कोश अमूल्य ठेवा आहे.

मराठी विश्वकोश

पांडुरंग नंदराम भटकर : मुकनायक वृत्तपत्राचे पहिले संपादक

पांडुरंग नंदराम भटकर : बाबासाहेबांचे समविचारी सहकारी डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे आज अवघ्या विश्वाला प्रेरक असणारं आणि मान्य असणारं व्यक्तिमत्...

लोकप्रिय पोस्ट